समताच्या राहाता शाखेने केला शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – मिलिंद बनकर, शाखाधिकारी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या राहाता शाखेने केला शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – मिलिंद बनकर, शाखाधिकारी
कोपरगाव : ठेवी, कर्ज, सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये राहाता शाखेने लक्षणीय वाढ केली असून राहाता तालुक्यातील सर्वच वयोगटातील सभासदांना समताच्या योजना आणि उपक्रमांची माहिती करून देत आहे. तसेच संस्थेची मूल्ये आणि दृष्टीकोनांप्रमाणे अविरतपणे सेवा देण्याचे काम ही करत आहे. त्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून भविष्यातही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करणार असल्याचे शाखेचे शाखाधिकारी मिलिंद बनकर यांनी सांगितले.
राहाता शाखेला २७ वर्षांचा इतिहास आहे. २४ वर्षात राहाता शाखेच्या ठेवी ३७ कोटी रुपयांच्या होत्या. तदनंतर शाखाधिकारी मिलिंद बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनसंपर्क, ग्राहक सेवा, मार्केटिंगचे सातत्य याचा अधिकाधिक वापर करून मागील फक्त ३ वर्षात ३७ कोटी रुपयांवरून ३१ जानेवारी २०२४ अखेर तब्बल १०० कोटी रुपयांच्या ठेवीच्या टप्पा गाठला असून फक्त ३ वर्षात ६४ कोटी रुपयांची वाढ हा समताच्या इतिहासात एक विक्रम प्रस्थापित झाला आहे – संदीप कोयटे, संचालक
शाखे विषयी अधिक माहिती देताना बनकर म्हणाले की, महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या १३ शाखा असून राहाता शाखेची स्थापना ११ मे १९९६ रोजी करण्यात आली. आज राहाता शाखेला २७ वर्ष पूर्ण झाली असून ३१ जानेवारी २०२४ अखेर राहाता शाखेच्या ठेवी १०१ कोटी ६६ लाख, एकूण कर्ज वाटप ३२ कोटी ६१ लाख रुपये केले आहे. सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये देखील राहाता शाखेने विशेष उच्चांक गाठला असून १६ कोटी ८० लाख रुपयांचे सोनेतारण कर्जाचे वाटप केले. या आर्थिक प्रगतीत शाखेतील विविध विभागाचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचा ही मह्त्वपूर्ण सहभाग आहे.
अत्याधुनिक सुविधांविषयी माहिती देताना शाखेचे सोनेतारण अधिकारी प्रवीण गमे म्हणाले की, राहाता शाखेद्वारा जेष्ठ नागरिकांना घरपोहोच पेन्शन सुविधा, लाॅकर सुविधा, मोबाईल बॅकींग, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी., आय.एम.पी.एस., क्यु.आर.कोड सुविधा, व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली, एस.एम.एस. यांसारख्या विविध सुविधा आणि योजना ग्राहक, सभासदांना देण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तालुक्याच्या ठिकाणी समता नागरी सहकारी पतसंस्थेची ११ मे १९८६ रोजी समाजातील व्यक्तींना पत निर्माण करून, त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून १३ शाखांच्या माध्यमातून सभासद हित जोपासत अविरतपणे सेवा देण्याचे काम करत आहे. तसेच समता पतसंस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.७४ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
या आर्थिक कामगिरीबद्दल समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक जितूभाई शहा, गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, कचरू मोकळ, संदीप कोयटे, गुलशन होडे, निरव रावलिया, कांतीलाल जोशी, संचालिका सौ.शोभा दरक, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राहाता शाखेचे अभिनंदन करून पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.