देश-विदेशमहाराष्ट्रसंपादकीय

गंगा उर्फ लक्ष्मी सुधाकर म्हमाणे : भक्तिमार्ग आणि शिक्षणाच्या प्रवासातील एक तेजस्वी वाटचाल

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

गंगा उर्फ लक्ष्मी सुधाकर म्हामाने यांचे छायाचित्र

गंगा उर्फ लक्ष्मी सुधाकर म्हमाणे : भक्तिमार्ग आणि शिक्षणाच्या प्रवासातील एक तेजस्वी वाटचाल

लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत एम. ए. ची पदवी घेऊन ६५ व्या वर्षी एम.फिल पदवी लक्ष्मी सुधाकर म्हामाने यांनी प्राप्त केली आहे. याचा आदर्श महाराष्ट्रातील केवळ वीरशैव लिंगायत समाजातील महिलांनीच नाही , तर समाजातील सर्व महिलांनी घेतला पाहिजे – सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे

गंगा उर्फ लक्ष्मी सुधाकर म्हमाणे यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, श्रद्धा, आणि शिक्षण यांचा संगम आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भक्तीचा गाढा प्रभाव असतानाच शिक्षणाची ओढ आणि कधीही न झुकणारा आत्मविश्वास होता. वयाच्या ६५ व्या वर्षी एम.फिल. पदवी प्राप्त त्या शिक्षणासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या स्त्रीचं ज्वलंत उदाहरण आहेत.

बालपण आणि शिक्षणाची सुरुवात : गंगा यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९४६ रोजी सोलापूर येथे गंगा शिवलिंगप्पा जिरगे या नावाने झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे बालपणातच जीवनाने त्यांना कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीतही १९६६ मध्ये त्यांनी अकरावीची परीक्षा बी श्रेणीत उत्तीर्ण केली, ही बाब त्यांच्या चिकाटीची आणि अभ्यासूपणाची साक्ष आहे.

विवाह आणि कौटुंबिक जीवन :१९६७ मध्ये त्यांचा विवाह सुधाकर महारुद्र म्हमाणे यांच्याशी झाला, जे मुंबई उच्च न्यायालयात टायपिस्ट म्हणून कार्यरत होते. विवाहानंतर त्या मुंबईतील गोरेगाव परिसरात स्थायिक झाल्या. पती त्यांना ‘लक्ष्मी’ या टोपण नावाने संबोधित असत. सुधाकर यांचे व्यक्तिमत्त्व धार्मिक आणि साधक वृत्तीचे होते. त्यांच्या साथीने गंगा यांचा अध्यात्म आणि भक्तीमार्गाकडे ओढा अधिक बळकट झाला.

शिक्षणाची दुसरी इनिंग : लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिक्षण सुरु ठेवले. 1988 मध्ये मुंबईतील एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर १९९० मध्ये मराठी विषय घेऊन एम.ए. पूर्ण केली.

एम.फिलचा प्रवास :१९९१ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात एम.फिल.साठी पूर्व परीक्षा देऊन प्रवेश मिळविला. ‘ज्ञानेश्वरांचा भक्तियोग (अध्याय ११ व १२)’ हा विषय घेऊन विभागप्रमुख डॉ. उषा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध लेखनास सुरुवात केली.

कुटुंब, संघर्ष आणि पतीचा आधार : गंगा यांना चंद्रशेखर व अमर ही दोन मुले झाली. घरगुती अडचणींमुळे शिक्षण थांबवावे लागले तरी त्यांच्या पतीचा त्यांना मोठा पाठिंबा होता. चंद्रशेखर पुण्यात उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर झाला तर अमरने एम.कॉम. पदवी प्राप्त करून मुंबईत नोकरी पत्करली.

२००३ मध्ये पतीच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. एकटेपणाची जाणीव, मानसिक तणाव, आणि विचारांच्या गर्दीतून त्यांना मार्गदर्शन मिळाले ते वाचन आणि संत साहित्याच्या साहाय्याने.

संत साहित्य आणि अध्यात्मिक बळ : ग्रंथालयात काम करताना त्यांनी विविध संत साहित्य, आत्मचरित्रे, आणि अध्यात्मिक ग्रंथ वाचले. याच वाचनाच्या आधाराने त्यांनी जीवनातील अनेक अडचणींना भक्तीमूल्यांच्या आधारे सामोरे जाण्याची ताकद प्राप्त केली.

विशेषतः सोलापूर विद्यापीठातील संत साहित्याचे अभ्यासक निर्मलकुमार फडकुले यांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन त्यांच्या विचारविश्वावर प्रभाव टाकणारे ठरले. त्या काळात प्रत्येक व्याख्यानासाठी त्या महाविद्यालयातून विद्यापीठात नियमित जात असत.

मुंबईत डॉक्टर रवींद्र थत्ते यांची व्याख्याने देखील त्यांनी नियमितपणे ऐकली. वैद्यकीय सेवा देतानाही ते संत साहित्याचा प्रसार करत असत. अशा या दोन संत साहित्य अभ्यासकांच्या सहवासामुळे त्यांच्या जीवनात अध्यात्माचे मोल अधिक दृढ झाले.

निष्कर्ष : गंगा उर्फ लक्ष्मी सुधाकर म्हमाणे यांचे जीवन म्हणजे अध्यात्म, शिक्षण, आणि संघर्ष यांच्या समन्वयातून घडलेले एक प्रेरणादायी उदाहरण आहे. पतीच्या निधनानंतरही त्यांनी आपल्या वाचन, भक्ती, आणि आत्मबलाच्या आधारे स्वतःला सावरले, आणि आपल्या मुलांचे भविष्य घडवले. त्यांचा जीवनप्रवास हे दाखवून देतो की शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते, आणि भक्तिमार्ग ही केवळ साधना नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारी शक्ती असते. त्यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे. अनेक संकटांतूनही न डगमगता शिक्षण आणि श्रद्धा या दोन गोष्टींनी जीवन समृद्ध करता येते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे