चेक बाउन्स झाल्याने समताच्या थकबाकीदारास कारावासाची शिक्षा…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
चेक बाऊन्स झाल्याने समताच्या थकबाकीदारास कारावासाची शिक्षा…
कोपरगाव : येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव शाखा – अहमदनगर यांचेकडुन कर्जदार कृष्णानंद संभाजी कांबळे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला ७० हजार रुपयांचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर अहमदनगर येथील फौजदारी न्यायालयात एस.सी.सी.नं. ३९३२/२०२१ व एस.सी.सी.नं. ३५३९/२०२१ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २५५ (०२) व निगोशिएबल इन्स्ट्युमेंट ॲक्ट १८८१ चे कलम १३८ खाली फौजदारी कारवाई केली. त्यात चौकशी अंती आरोपी कृष्णानंद संभाजी कांबळे यांनी गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने अहमदनगर येथील मे.ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आरोपीस ४ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
तसेच फिर्यादी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव, शाखा – अहमदनगर यांना थकबाकीदार कृष्णानंद संभाजी कांबळे यांनी एकुण ९४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. पतसंस्थेस नुकसान भरपाई देण्यात कसुर केल्यास किंवा नुकसान भरपाईची रक्कम १ महिन्याच्या आत आरोपीने न दिल्यास आणखी १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.असा आदेश अहमदनगर येथील १२ वे अतिरिक्त चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्रीमती एच.आर. जाधव यांनी पारीत केलेला आहे. तसेच आरोपी विरुद्ध शिक्षेचे वॉरंट काढण्यात आले. या कामी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोपरगांव यांचेतर्फे ॲड.गोरक्षनाथ तांदळे, ॲड.सौ.वृषाली तांदळे यांनी कामकाज पहिले. त्यांना ॲड.बी.एन.खेडकर यांनी सहाय्य केले. शाखाधिकारी श्री.नरेश गुंजाळ आणि वसुली विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.सोपान पठारे यांनी दिलेला जवाब महत्वाचा ठरला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१, कलम १५६ हे देखील सहकारातील अतिशय कठोर कायदे आहेत. जप्तीला उशीर लागला, तर आज ना उद्या पैसे भरावेच लागतात, देणे चुकत नाही. त्यामुळे कर्जदारांनी वेळेत व्याज भरून रिबेटच्या फायदा घ्यावा. तसेच कर्जदारांनी कोणत्याही पतसंस्थेस दिलेले चेक पास करता आला पाहिजे.अन्यथा अशा प्रकारची शिक्षा होऊन तुरुंगवासाची वेळ येऊ शकते याचे भान ठेवावे.असे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे वसुली विभागाचे अधिकारी श्री.जनार्दन कदम यांनी सांगितले.